सोलापूर (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला (गुरुवारी) गावागावांमध्ये मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या मिरवणुका डीजेमुक्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढाव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. तत्पूर्वी, जयंती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील शपथ दिली आहे.
सोलापूर शहरात पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी मिरवणुकांसह अन्य कोणत्याही कार्यक्रमांमध्ये डीजे चालणार नाही, असे आदेश काढले आहेत, त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्यांमधील
प्रभारी अधिकाऱ्यांकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डीजेमुक्त मिरवणुकीचा निर्णय घेतला.
याच पार्श्वभूमीवर ग्रामीणमधील सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मिरवणुकीत डीजे न वापरता पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा, जेणेकरून एक आदर्श समाजासमोर निर्माण होईल, असेही अधीक्षकांनी सांगितले
त्यानुसार ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सर्व जयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका देखील घेतल्या आहेत यंदाची शिवजयंती डीजेमुक्त होईल आणि राज्यात सोलापूरचा नावलौकिक वाढेल, असा विश्वास पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
