सोलापूर (प्रतिनिधी ) विजापूर नाका पोलिसांच्या
हद्दीत १५ दिवसांत दोन गुन्हे घडले. रात्रीच्या वेळी आयटी इंजिनियर ला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३) झाला. त्यावेळी वाहतूक पोलिसही असणार आहेत. सोलापूर शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विशेषतः विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोलापूर शहरात सलगर वस्ती, एमआयडीसी, सदर बझार, फौजदार चावडी, एमआयडीसी, जेलरोड व जोडभावी अशी सात पोलिस ठाणी आहेत. सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होते. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगवेगळी होती. पण, आता दररोज प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी, असा निर्णय झाला. तसेच या नाकाबंदीवेळी वाहतूक पोलिस देखील त्याठिकाणी असतील, असेही ठरले. दिवाळीच्या काळात असाच प्रयोग पोलिस आयुक्तांनी केला होता, त्यामुळे सणात चोरी, दरोड्यासारख्या घटना घडल्या नाहीत. त्या पद्धतीने आता दररोज तीन
ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

