सोलापूर(प्रतिनिधी ) शहरात वाहतूक पोलिसांचे दक्षिण व उत्तर असे दोन विभाग आहेत. वाहतूक नियमन सुरळीत व्हावे, रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी अंमलदार नेमले जातात. मात्र, ज्या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते, तेथे एकही अंमलदार नसतो. रस्त्यांलगत उभ्या वाहनांमुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सोलापूर शहरातील प्रवासी रिक्षांची संख्या सध्या ३५ हजारांवर पोचली आहे. ग्रामीणचे परमीट असलेल्या रिक्षा शहरातील रस्त्यांवरून धावतात. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या शेकडो
कारचालक रस्त्यांलगत वाहने उभी करून इतरत्र जातात. त्यात रिक्षांची गर्दी, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक अंमलदार नसल्याने सोलापूर शहरातील मुख्य एसटी स्टॅण्ड ते नवीवेस
पोलिस चौकी, या रस्त्यावर वाहनधारकांना अतिशय वाईट अनुभव येऊ लागला आहे. मंगळवार बाजार-टिळक चौक कन्ना चौक आणि सराफ बाजार परिसर, जिल्हा परिषद ते बेगम पेठ या रस्त्यावर ही हिच परिस्थिती आहे
वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे
छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, नवीवेस पोलिस चौकीसमोर, नवीपेठ, बेगम पेठ, जिल्हा परिषदेजवळील पूनमगेट, सराफ बाजार, रंगभवन चौक ते सिव्हिल चौक, सिव्हिल चौकातून जेलरोड पोलिस ठाण्याकडे जाणारा रस्ता, रेल्वे स्टेशनसमोर, आसरा चौक, आसरा पूल उतरून डी-मार्टकडे जाताना, धर्मवीर संभाजी तलावापासून पुढे शासकीय आयटीआयपर्यंतचा रस्ता, याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असून वाहतूक शाखेचे अंमलदारांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे वाहन धारकांमधून संताप व्यक्त केला जात असून ऐन दिवाळीच्या तोंडावर वाहतूक शाखेच्या नावाने हातावर चुना लावून बोंब मारण्याची वेळ या अंमलदारांनी आणल्याने अश्या बेशिस्त अंमलदारावर कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त एम राजकुमार कारवाई करणार की नाही ? आता पाहावं लागणार आहे.
