सोलापूर (प्रतिनिधी) पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिल २०११ रोजी दुचाकीवरून जाणाऱ्या प्रकाश बलभीम डांगे (रा. सिंधुविहार, सोलापूर) यांना अडवून तिघांनी त्यांच्याकडील दागिने व रोकड काढून तिघांनी जबरी चोरी केली होती. दोघांना पोलिसांनी अटक केली, पण तिसरा संशयित आरोपी पोलिसांना तेव्हापासून सापडला नव्हता. मंगळवारी (ता. १२) ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाजी सुरवसे
(मूळगाव रा. बोळेगाव, ता. तुळजापूर) याला सोलापूर शहरातील मंगळवार बाजारात पकडला.
अक्कलकोट नाका ते मुळेगाव या रोडवरून दुचाकीवरून निघालेल्या प्रकाश डांगे यांना तिघांनी अडविले. त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडील ७१ हजार रुपयांचा मोबाईल, लॉकेट, अंगठी व रोकड हिसकावून घेतली. त्यांनी एप्रिल २०२१ मध्ये सोलापूर तालुका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी
तातडीने गुन्ह्यातील दोन संशयितांना जेरबंद केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तिसऱ्या संशयिताचा शोध त्याच्या मूळगावी बोळेगाव (ता. तुळजापूर) शोध घेतला. पण, अटक चुकविण्यासाठी तो गाव सोडून गेला होता. तो न्यायालयात हजर होण्यासाठी त्याची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेशही निघाले. तरीपण, तो हजर झाला नव्हता. १२ ऑगस्ट २०२५ रोजी संशयित आरोपी बालाजी हा
सोलापुरातील मंगळवार बाजारात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक निलकंठ जाधवर यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार हरीदास पांढरे, आबासाहेब मुंढे, गणेश बांगड अनिस शेख यांच्या पथकाने सापळा रचून पकडले.
