सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पहाट’ उपक्रमांतर्गत २७ जून २०२६ रोजी मौजे धोत्री येथे पारधी समाजातील सुमारे ७० ते ८० नागरिकांशी संवाद व बैठक पार पडली.
बैठकीत पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी पारधी समाजासमोरील विविध समस्या जाणून घेतल्या. त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत प्रत्येक मुलाने शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे सांगितले.
पारधी समाजातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन, कांडप मशीन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली. यावेळी धोत्री येथील पारधी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला गावातील शेतकरी, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकेची प्रस्तावना वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे यांनी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज कांबळे, वळसंग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

