सोलापूर (प्रतिनिधी ) नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी अधिसूचित सेवा वेळेत न निकाली काढणाऱ्या आणि तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या ४१ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, बांधकाम परवाना, विविध झोन कार्यालय, आरोग्य विभाग, नगर रचना विभाग, कर आकारणी भूमिलेखापाल, भूमी मालमत्ता, उद्यान तसेच इतर संबंधित विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध सेवा विहित कालावधीत न दिल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये १७ फेब्रुवारी रोजी १० कर्मचाऱ्यांनी एकूण ४६ अर्ज प्रलंबित ठेवल्याप्रकरणी ४ हजार ६०० रुपये दंड आकारला आहे. १८ फेब्रुवारी रोजी ३१ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये प्रलंबित अर्जाची संख्या ७२ आहे तर एकूण ४ हजार ६०० रुपये दंड आकारला आहे. हा दंड त्यांच्या फेब्रुवारी २०२६ पेड इन मार्चच्या वेतनातून वसूल केला जाणार आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कामकाजातील निष्काळजीपणामुळे लोकसेवेवर परिणाम होत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
