सोलापूर (प्रतिनिधी)
यशस्वी जीवनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने योगा व मेडिटेशनचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दयानंद शिक्षण संस्था, वेलणकर हॉल, सोलापूर येथे आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. व्ही.पी. उबाळे होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश चोप्रा, शिक्षणशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. एस.बी. क्षीरसागर, वाणिज्य शाखेचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही. शिंदे भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. उबाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत विविध अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. गुणवत्तेचा पाया भक्कम करण्यासाठी योगा, कराटे, लाठी प्रशिक्षणासह मानसिक आरोग्यविषयक उपक्रमांची गरज आहे.
मंत्री श्री. पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, दयानंद शिक्षण संस्था ही सन १९४० पासून कार्यरत असलेली देशातील एक प्रगत शिक्षण संस्था आहे. सध्या संस्थेत सुमारे ८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योगा, लाठी, कराटे यांसारख्या प्रशिक्षणांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवा कुलकर्णी व आभार प्रदर्शन प्राचार्य क्षिरसागर यांनी केले.
