पारनेर (प्रतिनिधी ) सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेल्या मनमानी दुरुस्त्यांमुळे हा कायदा जनहिताच्या दृष्टीने कमकुवत झाला आहे याविरोधात आता राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यात चर्चा झाली. बैठकीत हजारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारबरोबर बैठक होणार आहे. सकारात्मक निर्णय झाला नाही, तर उपोषणावर ठाम असल्याची माहिती हजारे यांनी दिली. पांडे यांनी आज अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे चर्चा केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, की सरकारच्या धोरणांवर आपण नाराज आहोत. सध्याच्या बैठकीत सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कायद्याचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल, तर तातडीने एक नवी समिती नेमणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या समितीत माहिती अधिकार कायद्याचा सखोल अभ्यास असणारे आणि जनतेच्या बाजूने विचार करणारे अधिकारी असायला हवेत. सरकारकडून पाच जुलैपूर्वी सकारात्मक
निर्णय झाला नाही, तर आंदोलनावर आपण ठाम आहे. बैठकीस पुणे विभागाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर, आदी उपस्थित होते.
