सोलापूर (प्रतिनिधी ) दुचाकी अपघातामध्ये
हेल्मेट न वापरल्यामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'आधी पोलिस, मग जनता' या भूमिकेतून वाहतूक शाखेच्या सर्व अंमलदारांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून, सोमवारपासून (ता. १५) त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ११ जून रोजी झालेल्या बैठकीत वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक शाखेच्या सर्व अंमलदारांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सोलापूर शहरात सध्या वाहतूक शाखेचे सुमारे १६० अंमलदार कार्यरत आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांचा अहवाल
वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी सोमवारी स्वतः अंमलदार हेल्मेट वापरत आहेत की नाही, याची पाहणी केली.
शहरात वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने वाहनचालकांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर जखमी व्हावे लागते. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन
करण्यास सांगण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः आदर्श घालून देण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेनंतर शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील सर्व दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर मोहिमेला अधिक गती दिली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्याने अनेकांना गंभीर दुखापती होतात किंवा जीव गमवावा लागतो याला पोलीस कर्मचारी ही अपवाद नाहीत त्यामुळे हेल्मेट वापरायची सुरुवात पोलिसांपासून करण्यात आली आहे केवळ दंड वसुली नव्हे तर वाहनचालकांचा जीव वाचावा हा यामागील मुख्य उद्देश आहे.
*रवींद्र भंडारी*
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सोलापूर.
