सोलापूर (प्रतिनिधी) बदलते गुन्ह्यांचे स्वरूप, सायबर क्राइमच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि दहशतवाद ही पोलिस दलासमोरील आव्हाने आहेत. त्यामुळे पोलिसांनाच आता सजग राहून चालणार नाही तर लोकांना सजग करण्याचे काम करावे लागेल. अधिकारांचा लाभअधिकाधिक लोकांना मिळवून देण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी येथे केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सोमवारी प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारंभ झाला. मानवंदना स्वीकारल्यानंतर आयुक्त राजकुमार यांचे मार्गदर्शन झाले. ते पुढे म्हणाले, "पोलिस शिपाई हा पोलिस दलाचा महत्त्वाचा कणा आहे. शिस्त आणि सुरक्षा या द्विसूत्रीवर पोलिसांना काम करावे लागेल. प्रत्येक नागरिकांच्या अडचणींवर त्यांना मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवृत्त उपप्राचार्य राजकुमार शेरे, निवृत्त पोलिस निरीक्षक महादेव नाईकवडे, भरत राऊत आदी उपस्थित होते. उपप्राचार्य अशोक सायकर यांनी आभार मानले..

