सोलापूर (प्रतिनिधी ) मी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या
गाठीभेटी घेतल्या आहेत. लोकशाहीतील अदृश्य शक्ती असलेल्यांना भेटलो आहे. पालकमंत्री गोरे यांनी आपला आकडा नेमका किती आहे, हे आधी ठरवावे. कधी ते सहाशे म्हणतात, तर कधी पाचशे. गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन, हे त्यांनी ठरवावे, असा टोला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लगावला.विधान परिषद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. मोहिते-पाटील कुटुंबाला देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीबाबत बोलताना पालकमंत्री गोरे यांनी, ज्या फडणवीसांनी संपलेली कुटुंबे उभी केली, त्याच कुटुंबांनी त्यांच्या शब्दांचा अवमान केला. त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावरं प्रतिक्रिया देताना खासदार मोहिते-पाटील म्हणाले, मोहिते-पाटील यांना सोलापूरच्या जनतेने उभे केले आहे. आम्हाला कुठे नेऊन ठेवायचे, हे जनताच
ठरवेल. फडणवीस यांनी आम्हाला काय मदत केली आहे, याबाबत मी यापूर्वीही जाहीरपणे बोललो आहे.
उत्तम जानकर यांच्या सोबतचा वाद कसा मिटला, हे तुम्हाला का सांगू ? काय झाले आहे, ते निकालातून दिसेलच. आमदार नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा का दिला, हे त्यांनाच विचारलेले बरे. माझे मतदार माझ्याबरोबर आहेत. त्यांच्यासोबत मी सातत्याने काम करतो. तब्बल सहाशे अदृश्य मतदार माझ्या बाजूने आहेत, असा दावाही केला.
